*आ. सुधीर मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय ठरतेय नागरिकांसाठी वरदान*
*राज्यातील एकमेव अभिनव उपक्रम; जनतेच्या अडचणींवर तातडीने उपाय*
*शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांसह सर्वसामान्यांसाठी थेट सेवा*
*चंद्रपूर - जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्क व्यापक आहे. मतदारसंघातीलच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याकडून विकासकामांची आणि अडचणीत असलेल्यांना मदतीची अपेक्षा असते. अशात आपण स्वतः लोकांपर्यंत पोहोचायला हवे, या उद्देशाने दि.१९ मे पासून सुरू करण्यात आलेले आ. श्री. मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय आता नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. राज्यातील या एकमेव अभिनव उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.*
आ. श्री. मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या अडचणी, समस्या व तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे, हे विशेष. या उपक्रमांतर्गत जनतेला त्यांच्या गावात किंवा प्रभागातच आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी, कार्यालयीन कर्मचारी पोहोचत आहेत. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून लोकांना सेवा दिली जात आहे.
प्रलंबित कामे, शासकीय योजनांच्या लाभातील अडथळे, पायाभूत सुविधांबाबतची मागणी, रस्ते, नळजोडणी, वृद्धापकाळ, निवृत्ती, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या विषयांवर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात फिरते जनसंपर्क कार्यालय ही संकल्पनाच आ. श्री. मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा राबविल्यामुळे त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
"सत्ता ही खुर्चीसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे" या मूल्यांची जाणीव बाळगून सुरू केलेला हा उपक्रम लोकशाही अधिक बळकट करणारा आहे. शासकीय कार्यालयांच्या वारंवार चकरा मारण्याची गरज सर्वसामान्यांना पडू नये. उलट त्यांच्याच दारात जाऊन मदत पोहोचविली जावी. या उद्देशांची पूर्ती करणारा हा उपक्रम राज्यासाठी एक आदर्श ठरत आहे.
राज्यभरातून या अभिनव उपक्रमाचे जोरदार स्वागत होत असून, इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारा प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिक आपले प्रश्न मोकळेपणाने मांडत आहेत. त्यावर प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यापुर्वीही,आ.मुनगंटीवार यांचे कार्य विक्रमांचे नवे शिखर गाठणारे ठरले आहे. देशातील पहिले ISO प्रमाणित मंत्री कार्यालय उभारण्याचा मान त्यांच्या कार्यालयाला मिळाला, तर त्यांच्या पुढाकारातून दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि चार लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् नोंदविले गेले. इंडिया टुडे आणि आज तक या मंचावर केंद्रीय अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या हस्ते त्यांना ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया’ हा बहुमान मिळाला. याशिवाय ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला. विधानभवनात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते ‘आदर्श संसदपटू’ म्हणून गौरवण्यात आले. भव्य दिव्य चंद्रपूर येथील सैनिक शाळा आ.मुनगंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देते.
*फिरत्या जनसंपर्क कार्यालयातून तातडीने कार्यवाही*
प्रत्येक घरकूल लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल आणि बल्लारपूर येथील लाभार्थ्यांना वाळू वितरणाचे नियोजन करण्यात येत आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधत हे काम अधिक प्रभावीपणे पार पडत आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना भरपाई मिळावी यासाठी मदतीचा पुढाकार घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
गोसीखुर्द प्रकल्पातील पाइपलाइनमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. गावकऱ्यांच्या शेतांमध्ये पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे तातडीने भरून शेती पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भादुर्णी येथे वाघाच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाला मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भादुर्णी येथे वाघाला त्वरित जेरबंद करण्यासाठी वनविभागाला आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या